All Our Greates Bhujan Development Work The Revolutionary Buddha Indians

  • Breaking News

    16 - नव मानव-धर्माच्या शोधात

     अध्याय 16 - नव मानव-धर्माच्या शोधात


    संसारत्यागाच्या मागे काय होते?

    मामुली साधू संत मोक्षासाठी संसारत्यागासाठी भगतगणांना शिकवण देतात. डेबूजीला हे मोक्ष मुक्तीचे आणि हरिनाम – स्मरणाने भवसागर तरून जाण्याचे आध्यात्मिक खूळ कधीच पटले नाही. जिवंत असता उपाशी मरा नि स्वर्गातल्या अमृतासाठी जवळ असेल नसेल ते दान करा, ही संताळी विचारसरणीही त्याने जुमानली नाही. आजही जुमानीत नाही. मग तो संसाराचा त्याग करून बाहेर का पडला? केवळ स्वतःच्या उद्धारासाठी तळमळत नव्हता. स्वतःच्या चिमुकल्या टीचभर संसारातल्या आधीव्याधींची कोडी त्याला सोडवायची नव्हती. ज्या मागासलेल्या खेडूती समाजात त्याचा जन्म झाला, त्यांच्या देवधर्माच्या भावनांवर नि कल्पनांवर त्याचा विश्वास नव्हता. धर्माच्या नावाखाली रूढ असलेल्या अनेक दुष्ट आणि व्यसनी चालीरितींच्या विरुद्ध त्याने बंडे केली होती आणि जातगोतवाल्यांचा रोषही पत्करला होता. देवाच्या नुसत्या नामस्मरणापेक्षा किंवा आराधानेपेक्षा मनगट घासून कष्टमेहनत केल्यानेच शेतीच्या मातीतून सोने काढता येते आणि शुद्ध आचारविचारांनी निर्मळ राहिल्यानेच व्यवहारातल्या दुष्ट नि लोभी माणसांच्या कारस्थानांना चाणाक्षपणे नि धीटपणाने पायबंध  ठोकता येतो, हे त्याने स्वानुभवाने इतरांना पटवूनही दिले होते. भजनाचा त्याला नाद होता आणि ईश्वरावर त्याचा भरवसाही होता. तरीही त्याची भक्ति आंधळी नव्हती. डोळस होती. वयाच्या २८ वर्षेपर्यंत जूबाजूच्य सर्व थरातील समाजांच्या सामिक नि धार्मिक जिण्याचे त्याने सूक्ष्म निरीक्षण केलेले होते. शेतकरी कामकरी वगैरे मागासलेले समाज, हाडमोडी कष्ट करूनसुद्धा कमालीच्या दारिद्र्यात किड्यामंग्यांच्या जिण्याने जगत आहेत. सावकारादि वरच्या थरातले वरचढ लोक त्यांना यंत्रासारखे कामाला जुंपून, त्यांच्या श्रमाची फळे आपण मटकावीत आहेत. श्रमजीवी लोकांना तर त्यांच्या भिकार जीवनाची ना चिळस ना लाज. वरचढांच्या लाथा खाव्या, मरे मरेतो कष्ट करून त्यांच्या तिजो-या भराव्या, आपल्या संसाराच्या मातीने त्यांची घरेदारे नि वाडे लिंपावे-शृंगारावे, हाच आपला धर्म, हेच आपले जिणे, यापेक्षा आणखी ज्ञान त्यांना काही नाही. केवळ पशुवृत्ती! वरच्या खालच्या एकंदर समाजाची दैनंदिन स्थिति पाहिली तर माणसेच माणुसकीला पारखी झालेली. धर्माचे आचरण पाहिले तर तेथेही भूतदयेला थारा नाही. देवाला दारू, माणसांना दारू, रेडे बोकडांच्या कंदुरीशिवाय देवाची शांति नाही आणि धर्माची भूक भागत नाही. भजनकीर्तनाचा थाट केवळ मनाच्या विरंगुळ्यासाठी. संतांचे बोल वतनदारीसाठी. संगीत सुराने वरच्यावर भिरकवायचे. अंतःकरणाचा नि त्यांचा जणू काय संबंधच नाही. सहानुभूती सहकार नि सेवा या भावनाच हद्दपार झालेल्या. ज्याला जिथे मऊ लागेल तिथे कोपराने खणावे नि स्वार्थ साधावा. आजवरच्या साधूसंतांनी माणसांना माणुसकी शिकवण्यासाठी जान जान पछाडली. कोटिकोटि अभंगरचना केली. पंढरीच्या वा-यांचा परिपाठ चालवला. विठ्ठलभक्तीचे लोण आब्राह्मण चांडाळांच्या झोपडी झोपडीपर्यंत नेऊन भिडवले. टाळ माळ चाळ एवढा वरवरचा देखावा झुगारता आला नाही. या परिस्थितीला आरपार पालटण्यासाठी काय केले पाहिजे? मला काय करता येईल? या मुद्याचाच डेबूजी आपल्या मनाशी बरीच वर्षे खल करीत होता.

    षड्रिपूंचे दमन कसे केले?

    सन १९०५ साली घरातून बाहेर पडल्यापासून तो सन १९१७ या बारा वर्षांच्या साधकावस्थेत डेबूजीने आपल्या देहमनाचा चोळामोळा करून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंचे गाळीव वस्त्रगाळ पीठ कसकसे केले. त्याच्या हजारावर गोष्टी सांगता येतील. या संक्षिप्त कथानकात केवळ त्रोटक संदर्भावरच भागवणे जरूर आहे.
    घरातून बाहेर पडल्यावर डेबूजी २-३दिवस सारखा चालतच होता. कोठे जायचे नि काय करायचे याचा काही विधनिषेध नसल्यामुळे, पाय नेतील तिकडे, एवढाच कार्यक्रम. दापुरीपासून ४०-४५ मैलावरच्या एका गावी सायंकाळी गावाबाहेरच्या मारुतीच्या देवळात विसाव्यासाठी जाऊन बसतो न बसतो तोच हा कुणीतरी दरोडेखारंचा टेहळ्या असावा, अशा समजुतीने गावक-यानी नि पाटलानी उपाशीतापाशी गावाबाहेर हुसकावून दिला.
    पौषाचा महिना. व-हाडातली थंडी, माणूस जागच्या जागी हातपाय काकडून कोलमडून पडायचे. किर्र अंधारी रात्र. काट्याकुट्यातून पाय नेतील तसा बिचारा डेबूजी वाट काटीत चालला. वाटेत त्याला एक खळखळणारा ओढा लागला. त्याने हात, पाय, तोंड धुतले. रिकाम्या पोटात अन्नाच्या ऐवजी पाणी रिचवले. थोडी हुशारी येताच शेजारच्या शेतातली ज्वारीची चार पाच कणसे तशीच कच्ची खाऊन वर पाणी प्याला. विसाव्यासाठी ओढ्याच्या काठीच – मातीवर झोपेसाठी अंग टाकले. किर्र जंगल. आजूबाजूला श्वापदांचा सुळसुळाट. पण काही नाही. खुशाल तो डाराडूर तिथे झोपी गेला.
    झुंजुमुंजू होताच उठावे. दिवसा आढळतील त्या दहा पाच गावी भ्रमण करावे, एकाद्या घरी भाकरी तुकडा मागावा, मिळाल्यास खावा, नकार दिल्यास आणखी काही तरी मागावे, लोकांनी रागवावे, शिव्या द्याव्या, मारायलाही उठावे. हुसकावून द्यावे. यांच्या शांत वृत्तीवर लवभरसुद्धा परिणाम व्हायचा नाही. हुसकावले का पुढे जावे. या रीतीने गावांमागे गावे नि खेड्यांमागे खेडी धुंडाळीत डेबूजी कोठेकोठे भटकंती करीत जाई त्याचा त्यालाच ठावठिकाणा उमजे ना.
    दिवसामागून दिवस गेले. दाढीचे नि डोक्याचे केस वाढले. जटा झाल्या त्यांच्या. अंगावर चिंध्या बाजल्या. नदी ओढा लागला का तेथे आंघोळ करावी नि त्याच धुतलेल्या चिंध्या ओल्याच अंगावर पांघरून पुढे चालू लागावे. अशा विचित्र थाटाने ही स्वारी एकाद्या गावात घुसली का गावची ओढाळ कुतरडी भुंकभुकून आधी त्याचे स्वागत करायची. मग गावची उनाड पोरे त्याच्या मागे ``वेडा आला रे वेडा आला’’ असा कल्होळ करीत मागे लागायची. दगड मारायची. हा सर्व उपसर्ग शांत चित्ताने हासतमुखाने तो सहन करायचा. त्याचे पाय सारखे चालतच असायचे. विसाव्यासाठी गावात त्याला कोणी थाराच द्यायचे नाहीत. अर्थात विसाव्यासाठी सदानकदा किर्र निर्जन अरण्याचाच आसरा घ्यावा लागे.
    THOUGHTS ON LINGUISTIC STATES