All Our Greates Bhujan Development Work The Revolutionary Buddha Indians

  • Breaking News

    12. आता काय? मटण दारूची चंगळ!

    अध्याय 12 - आता काय? मटण दारूची चंगळ!

    डेबुजीचे साधुतुल्य चरित्र आणि चारित्र्य पंचक्रोशीत गाजत वाजत असतानाच सौ. कुंताबाई बाळंत होऊन तिला मुलगी झाली. सखुबाईला पृथ्वीवर स्वर्गच आल्यासारखे वाटले. मुलाच्या बाजूने नाही तरी मुलीच्या बाजूने पणतंडवाचे तोंड पाहिले म्हणून म्हातारा हंबीरराव नि रायजाबाई आंदाने नाचू लागले. डेबुजीला मुलगी झाल्याची बातमी पंचक्रोशीत फैलावताच, गोतावळ्या जमातवाल्यांच्या तोंडाला पाणी सुटले. आता काय! बाशाच्या दिवशी डेबुजीकडे मटण दारूचे पाट वाहणार! या आशेने जो तो आमंत्रणाची वाट पाहू लागला.



    परटाच्या आयुष्यात तीन बळी.
    ही एक म्हणच प्रचारात होती. गरीब असो वा कोणी असो, जन्म, लग्न नि मरतिकीच्या प्रसंगी बोकडाची कंदुरी आणि मनमुराद दारू जातगोतवाल्यांना दिल्याशिवाय चालत नसे. मोठ्ठा जातधर्मच होता तो. कर्ज काढून, भीक मागून हे देवकार्य करावेच लागे. न करील तो पडलाच वाळीत.

    रूढीप्रमाणे हंबीररावाने बोकडाची कंदुरी नि दारूचा बेत ठरवला. त्याचा घरात खल सुरू होताना सखुबाई कुरकुरू लागली. तिला आपल्या नव-याचे मरणकालचे ते शब्द आठवू लागले. त्या सगळ्या दुर्दैवी घटनांचा चित्रपट तिच्या डोळ्यांपुढे भराभर सरकू लागला. डेबुजीच्या कानावर हा बेत जाताच त्याने तडाड नकार दिला. ``आजवर आपल्या घरात चुकूनसुद्धा जे आपण कधी केलं नाही, ते काय आज करणार? भले जातगोतवाले रागावले तर. प्रसंगाला आले का कुणी धावून आमच्या? आमचे आम्हालाच निपटावे लागले ना? बारशाला मटण दारू द्यावी, असं कुठच्या धर्मात सांगितलंय? जगावेगळा धर्म आहे हा. मला नाही तो पसंत. आपल्या घरात मटण दारू बंद. कायमची बंद. काही चांगलं गोडधोड करून घालू गोतावळ्यांना मेजवानी.’’

    जातकुळीला बट्टा लावलात तुम्ही.

    गोतावळी मंडळी जमली. पाने वाढली. पण दारूचा वास तर कुठेच येत नाही? हे काय? पानावर पाहतात तो बुंदीचे लाडू वाढलेले! एक पुढारी गरजले - ``काय हो हंबीरराव, हा काय जगावेगळा प्रकार? बारशाला बुंदीचे लाडू? मटण दारू नाही? जातगोताची रूढी मोडता? आम्हाला नाही परवडणार असला अधर्म. जातकुळीला बट्टा लावलात तुम्ही. चला उठा रे. कोण असले जेवण जेवतो?’’ बिचारा हंबीरराव तर सर्दच पडला. डेबुजी पुढे सरसावला. पुढारी हुज्जत घालायला उठले त्याच्याशी. सगळेजण रागाने तापले होते. त्यांचा आवाज चढला होता. दारू मटणाच्या आशेने आलेल्या लोकांची निराशा भयंकर असते. खेडूतांत असा प्रसंगी खूनही पडतात. अगदी शांतपणाने पण निश्चयाने डेबुजी एकेक शब्द बोलू लागला. ``बापहो, नीट ऐकून घ्या. तुम्ही म्हणता ती मटण दारूची रूढी धर्माची नाही. आपल्या अडाणीपणाची नि जिभलीच्या चोचल्याची आहे. आपले धर्मगुरू बामण. ते कधी मारतात का बकरा? पितात का दारू? बारशा लग्नाला नि मरतिकीच्या तेराव्यालासुद्धा ते गोडधोड पक्वान्नांच्याच जेवणावळी घालतात. त्यांना धर्म माहीत नाही, असं का म्हणणं आहे तुमचं?’’

    पुढारी – बोकड मारला नाही, दारू पाजली नाही, तर मुले जगत नाहीत.

    डेबुजी – कुणी सांगितलं राव तुम्हाला हे? तुमचं तुम्ही मनचंच ठरवलंय सगळं. मारवाडी, गुजराथी किती श्रीमंत असतात! खंडी दोखंडी बकरी मारण्याच्या ऐपतीचे असतात. त्यांनी कधी बोकडाची कंदुरी केली नाही. दारू पाजली नाही. म्हणून काय त्यांची मुलेबाळे जगली नाहीत? त्यांचा काय निर्वंश झाला? उलट कंदुरी दारूचे पाट वाहवणारे आपण पहा. काय आहे तुमची सगळ्यांची दशा? शेताच्या मातीत मर मर मरता, पण सकाळ गेली, संध्याकाळची पंचीत. या मटण दारूच्या पायी घरेदारे, शेतीवाड्या सावकरांच्या घरात नेऊन घातल्यात, तरी डोळे उघडत नाहीत. विचार करा मायबाप. भलभलत्या फंदाला धर्म समजून गरीब प्राण्यांची हत्या करू नका. जीव जन्माला आला का दुस-या एका जीवाची हत्या आणि कुणी मेला तरीही पुन्हा हत्याच! हा काय धर्म समजता? चला बसा पानांवर, चांगले गोडधोड पोटभर खा, आनंद करा नि घरोघर जा. मटण-दारूच्या व्यसनाने जमातीचे आजवर झाले तेवढे वाटोळे पुरे झाले. आता जरा माणसात येऊन माणुसकीने वागू या सगळे.

    या शांत पण कट्टर निस्चयी बोलण्चा परिणाम चांगलाच झाला. एकालाही त्याचे म्हणणे खोडून काढता येई ना. सगळे गातोवळे मुकाट्याने जेवले. मुलीच्या बारशाची ही बुंदीच्या लाडूंची मेजवानी दापुरीच्या पंचक्रोशीत काय, पण हां हां म्हणता सगळीकडे फैलावली. वेळ प्रसंग पाहून लोकांच्या आचार विचारांना धक्का देण्याच्या कुशलतेतच समाज-सुधारकाची खरी शहामत असते. गाडगेबाबांच्या चरित्रातला हा पैलू आजही प्रखरतेने जनतेला दिसत असतो.

    THOUGHTS ON LINGUISTIC STATES